जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली अंबड-जालना रोडवरील लक्ष्मी पेट्रोल पंपावर खुलेआम कॅन, बॅरल मध्ये विक्री
अंबड प्रतिनिधी :-
जालना जिल्हा प्रशासनाचे दि. 20 मे रोजी आदेश काडून कॅन, बॉटल व ड्रम मध्ये पेट्रोल, डिजेल विंधन पुरवठा करू नये.विंधन पुरवठा फक्त गाड्यामध्येच करण्यात यावा अशा कडक नियम आणि आदेशांना साफ धाब्यावर बसवून अंबड-जालना रोडवरील पारनेर फाट्याजवळील लक्ष्मी पेट्रोल पंप वर (एचपी कंपनी ) दिवसाढवळ्या डिझेलचा कॅन, ड्रम आणि बॉटल मध्ये विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांची पायमल्ली करत या पंपावर नियमबाह्य पद्धतीने बॅरल आणि कॅनमध्ये डिझेलची सर्रास विक्री केली जात असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नियम कागदावर, काळाबाजार रस्त्यावर
सुरक्षेच्या कारणास्तव आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खुल्या कॅन किंवा बॅरलमध्ये इंधन देण्यास कडक बंदी घातली आहे. मात्र, लक्ष्मी पेट्रोल पंप, पारनेर येथे या आदेशाची जणू काही भीतीच उरलेली नाही.दि.२१ मे २०२६ गुरुवार रोजी या पंपावर ग्राहकांना वाहनांऐवजी थेट मोठमोठ्या बॅरल आणि प्लास्टिकच्या कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात असल्याचे उघडकीस आले.
अतिशय गजबजलेल्या अंबड-जालना हायवेवर प्रशासकीय नियमांची अशी दिवसाढवळ्या ऐशीतैशी होत असताना स्थानिक पुरवठा विभाग आणि संबंधित अधिकारी झोपले आहेत का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
सुरक्षा वाऱ्यावर छुप्या साठेबाजीला खतपाणी
कॅन आणि बॅरलमध्ये बेकायदेशीरपणे इंधन पुरवल्यामुळे केवळ महसुलाचा आणि नियमांचाच खेळखंडोबा होत नाही तर यामुळे मोठ्या अपघाताची भीती देखील निर्माण झाली आहे. ज्वलनशील पदार्थांची अशी उघड्यावर वाहतूक करणे धोक्याचे असतानाही केवळ आर्थिक फायद्यासाठी पेट्रोल पंप चालकांकडून कायद्याला हरताळ फासला जात आहे. हा डिझेलचा साठा नेमका कुठे आणि कशासाठी वापरला जातोय ? यात कोणती मोठी टोळी सक्रिय आहे का ? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
आता कारवाई होणार की अभय मिळणार ?
सध्या हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला थेट आव्हान देणाऱ्या या लक्ष्मी पेट्रोल पंपाचा परवाना तात्काळ रद्द होणार का ? की नेहमीप्रमाणे ‘वरकमाई’ करून या प्रकरणावर पांघरूण घातले जाणार? याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या खुल्या काळाबाजारावर जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाने तात्काळ धडक कारवाई करून संबंधित पंपावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरू ला
गली आहे.




